एकदा त्या भास्कराला मानवाचा राग आला
राग येता तापला तो खूप लालेलाल झाला
काय सांगू धावतो रे सारखा मी तो म्हणाला
सारखा जाळून घेतो माणसासाठी स्वतःला
मानवाचे वागणे हे फार आता दुष्ट झाले
स्वार्थ त्याचा साधण्याला पृथ्विला विद्रूप केले
तोडली झाडे किती ती फार ना पाऊस येतो
आज पाण्याच्या अभावी सारखा दुष्काळ होतो
वाढते जी उष्णता ही त्यात माझा दोष नाही
दोष सारा मानवाचा भ्रष्ट केले सर्व काही
आजही ना वेळ गेली वागणे आता सुधारा
मानवा हो आज जागा मी तुला देतो इशारा
वापरा पाणी जपूनी सांगतो मी झाड लावा
वाढल्याने उष्णता ही ना कुणाला ताप व्हावा
काय ते होईल सांगा मी चिडूनी बंड केले
राग माझा वाढला नी धावणे मी बंद केले
©जितू
#Morning